प्रकार:
|
पेय
|
गरम
|
किती जणांसाठी: ४
|
प्रक्रिया: उकळणे व फोडणी देणे. स्वच्छ सार हवे असल्यास पाला मिक्सरमधे वाटणे व सार तयार झाल्यावर गाळणे.
|
पौष्टिकता:
|
जीवनसत्त्वे व क्षार
|
चोथा (फायबर) – न गाळल्यास
|
स्निग्ध पदार्थ – लोणी किंवा फोडणी
प्रोटीन्स – वाटाणा/हरभरा घातल्यास
| |
वेळ:
|
पूर्वतयारीचा:
|
५ मि
|
वाढण्याचा:
|
२ मि
|
पाककृतीचा:
|
५ मि
|
खाण्याचा:
|
१० मि
|
नाव:
|
चाकवत-कोथिंबीर
सार
|
प्रस्तावना:
|
हे अप्रतीम चवदार, स्वादयुक्त,
भूक वाढवणारे, तरतरी आणणारे आणि शिवाय जीवनसत्वे व क्षारयुक्त हिरवे सार आहे. हे
आपण संध्याकाळी चहाच्या वेळी (चहाऐवजी) घेऊ शकतो. पण याची मजा एकत्र बसून गप्पा
मारत घेण्यामधे आहे. म्हणून आपण ते रात्री जेवणाआधी अर्धा तास (ड्रिंक्स ऐवजी)
मित्रांबरोबर घेऊ.
|
इच्छा:
|
हे आपण चार जणांसाठी बनवूया. त्यासाठी
मित्रांना/मैत्रिणींना (तुम्ही अनुक्रमे पुरुष किंवा स्त्री असाल त्याप्रमाणे
किंवा जोडीदाराच्या परवानगीने किंवा आपल्या जबाबदारीवर) आधीच बोलावून ठेवू.
|
पूर्वतयारी:
|
मित्र/मैत्रिणी येतील ते काही
फक्त सार पिऊन जाणार नाहीत. तेव्हा त्यांना जेवायलाच बोलवावे लागेल. (जेवण
बनवण्याची जबाबदारी पाक-कलाकुशल जोडीदारावर किंवा इतर कुणावर सोपवूया कारण आपण
अजून पाककला शिकतोय).
|
तयारी:
|
आपल्याला चार कप पाणी, दोन
ओंजळी चाकवताची (पालक किंवा चुक्याचीही चालतील) पानं, दोन मुठी कोथिंबीर, मिळाल्यास
५-६ पुदिन्याची पानं, दोन मध्यम तिखट मिरच्या, बोटभर आलं, पाच-सहा लसूण-पाकळ्या,
अर्धं लिंबू, चार चमचे मक्याचं (कॉर्नचं) पीठ, मीठ आणि साखर लागेल.
पातेलं, झाकणी, डाव, चार
बाऊल्स, चार चमचे आणि अग्नीस्त्रोत हे अर्थातच हवे.
|
पाककृती:
|
आता चाकवताची पानं (अर्थातच
काळजीपूर्वक स्वच्छ धुतलेली) मिक्सरमधून बारीक करून (स्वच्छ सार हवे असल्यास) किंवा
बारीक चिरून घेऊ. कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. आलं व लसणाचे बारीक काप करून घेऊ (किंवा
आलं किसून व लसूण ठेचून चालेल), मिरच्यांना उभा छेद देऊन ठेवू, लिंबाचा रस काढून
ठेवू आणि कॉर्नचे पीठ अर्धा कप पाण्यात भिजवून ठेवू.
आता पातेल्यात चार कप पाणी
उकळत ठेवू. त्यात आलं, लसूण व साखर टाकू. पाण्याला काटा आल्यावर (पाण्याला उकळी
फुटण्याआधी बुडबुडे फुटायला सुरुवात होण्याची स्थिती) त्यात चाकवताची
वाटलेली/चिरलेली पाने व चिरलेल्या कोथिंबीरीतील अर्धी कोथिंबीर व पुदिन्याची
पानं टाकू. मग त्यात उभ्या चिरलेल्या मिरच्या व चवीपुरते मीठ टाकून झाकण ठेवू.
पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात भिजवलेलं मक्याचं पीठ (कॉर्न फ्लोअर) हळूहळू टाकून
झाकण ठेवून मंद गॅसवर एक मिनिट (मनात साठ आकडे मोजू) उकळत ठेवू. नंतर गॅस बंद
करून झाकण काढून त्यात लिंबाचा रस टाकू.
|
समृद्धीकरण
|
लिंबाचा रस व नंतर लोणी टाकून
आपण थोडे समृद्धीकरण केलेच आहे. थोडा हिरवा वाटाणा/हरभरा अर्धवट बारीक करून
(किंवा पेस्ट करून) घातलेला छान लागतो (तेवढेच थोडे प्रोटीन). पण आत्ता आपण
साधेच सार करायला शिकत असल्याने समृद्धीकरणाचा फार विचार करणार नाही आहोत.
|
कौशल्य:
|
·
आलं, लसूण व हवे असल्यास
दालचिनी-लवंग-मिरपूड पाण्यात लगेच टाकल्यास त्यांचे स्वाद चांगले उतरतील.
·
चिरलेला चाकवत व कोथिंबीर पाण्याला
काटा आल्यावर टाकल्यानं ती योग्य प्रमाणात शिजतात (अती जादा शिजत नाहीत)
त्यामुळे त्यांचा रंग (स्वच्छ हिरवा) व स्वाद कायम रहातो व मुख्य म्हणजे त्यातील
जीवनसत्वं नाश पावत नाहीत.
·
हिरव्या मिरच्या उशीरा टाकल्यानं
त्यांचा ताजा स्वाद टिकून राहातो व तिखटपणा जास्त उतरत नाही. सार जास्त तिखट हवे
असल्यास त्या आधी टाकाव्या.
·
लिंबाचा रस वाढण्याच्या आधी टाकल्यानं
सार कडसर होत नाही.
·
चाकवताच्या सारात साखर घातली नाही तरी
चालेल. चाकवताऐवजी पालक वापरल्यास पालकाचा उग्र स्वाद घालवण्यासाठी थोडी साखर
टाकावी. चुका वापरल्यास तो मुळात आंबट असल्यानं लिंबाच्या रसाची जरूर नाही व
साखर थोडी जास्त (आवडीनुसार) टाकली तरी चालेल.
|
सजावट:
|
वरच्या सूचनांचं नीट पालन करून
सार केलं असल्यास त्याला सुंदर हिरवा रंग येईल व वाढताना त्यावर जिर्याची फोडणी
(किंवा चमचाभर लोणी) व थोडी कोथिंबीर टाकली की पुरेल. थोडी विरोधी रंगसंगती हवी
असल्यास थोडं किसलेलं गाजर घालूया.
|
वाढप:
|
·
आता नीट ढवळत वाडग्यांमधे वाढून घेऊन
त्यावर उरलेली चिरलेली कोथिंबीर टाकून मित्रांपुढं सादर करू.
·
या वेळेपर्यंत वाफांनी स्वादवार्ता
पोचवलेली असल्याने सर्वजण आस्वाद घेण्याच्या तयारीत आधीच सज्ज होऊन बसलेले
असतील. त्यांच्यापुढे साराचे वाडगे ठेवू, स्वतःचा वाडगा घेऊन बसू आणि म्हणू, “चला,
आता साराचा स्वादानंद घेऊया”. (त्यांनी आधीच ते भुरकायला सुरुवात
केली नसेल तर!)
|
आस्वाद:
|
मग आधी डोळ्यांनी, मग नाकानं आणि
नंतर जिभेनं (हळूच, कारण जीभ भाजेल) आपण साराचा आस्वाद घेऊ. (जरा निवल्यावर
वाडगा तोंडाला लावून भुरकलं तरी चालेल. ... कुणाला?)
|
चिंतन:
|
·
फक्त आस्वाद-समाधी. हळूहळू उबेची
जाणीव. मित्र/मैत्रिणींचा सहवास व गप्पा. शेवटी वाढत्या भुकेची जाणीव.
·
मधेच कधी वाटलं तर या सारानं येणारी
ऊब व इतर पेयांनी येणारी ऊब यांचा तौलनिक विचार.
|
No comments:
Post a Comment